`मी`... `तू`... `आपण`...
`मी`... `तू`... म्हटलं तर ही
फक्त सर्वनामं... `मी` म्हटलं तर बरंच काही...
`तू` म्हटलं तरी बरंच
काही... या `मी`-`तू`मध्ये भोवतालच्या
असंख्यजणीही येतात. या `मी`ला कुणी काही
म्हणतं, कुणी काही... पण `ती`ला ना सीमा... ना
कोणत्या रेषा... ना जात... ना कोणते पंथ... ही `मी` आहेच अशी अनादी... अनंत... आपल्या पुराणातल्या
व्यक्तिरेखांपासून ते आजच्या शतकातल्या आपल्यासमोर वावरणाऱ्या प्रत्येकीमध्ये ती
दडलेली आहे. `मी` काही इथं
बायकांच्या इतिहास-भूगोल उगाळायला बसलेली नाहीये. `झालं
गेलं गंगेला मिळालं`... असं म्हणतात... हाsहाsहाsss म्हणजे सगळं काही पोटात घ्यायचं `ती`नं...`गंगे`नं... असो...
कसं आहे ना की,
वर्षांनुवर्षांच्या त्याच त्या वेदना, हुंकार नि निःश्वासांची सवय झाल्येय आता
आपल्याला... आपल्याला नि आपल्या भोवतालच्यांनादेखील... मग `महिलादिना`सारखं एखादं निमित्त
शोधायचं नि महिलांच्या कर्तृत्वाला सलाम ठोकायचे... त्यांचा आदर-सत्कार करायचा...
नि मग वर्षभर... हां, आता काहीजण, काही संस्था अतिशय पोटतिडकीनं या सगळ्याबद्द्ल
काम करताहेत... मुंगीच्या पावलानं का होईना बदल घडतोय. हे खरंय. पण... मध्यंतरी माध्यमातल्या
एका मैत्रिणीनं लिहिलेलं होतं की, ``आपल्याला दुःख
विकायला आवडतं... विकत घ्यायलाही आवडतं... पण तेच जर आयुष्याचा जरासा भाग झालं की
आपण विस्कटतो... पांढरपेशी जगण्याची एक खूण...`` या चार वाक्यांत `तिनं` तर आपल्या दुःखाचं
सारच सांगून टाकलंय... जणू असं की एखाद्या रहस्याचा स्फोटच झाला असावा...
कसं आहे ना की, असे
स्फोट होणं अगदी जरूरीचं आहे. बास्स झाले की, आता वेदना, हुंकार नि निःश्वासांचे
ढोल बडवणं... आता आपलं आपणच सक्षम व्हायचं असं मनाशी ठरवून टाका एकदा कायमचंच. `जे ठरवाल ते होतंच`, असं
म्हणतात. एरवीही आपण पक्कं असं ठरवून कितीतरी गोष्टी करतोच की... माध्यमांनी नि
प्रायोजक असणाऱ्या जाहिरातींच्या चकचकाटी दुनियेतली `लिटिलस्टार`, `यंगस्टार`, `सुपरस्टार`, `सुपरमॉम`, `सुपरदादीमॉं` अशी चढत्या
श्रेणीतली लेबलं आपणच आपल्याला लावून घेणं बंद करायला हवं. आपल्याला सगळ्या गोष्टी
मँनेज करता यायलाच पाहिजेत, हा अट्टाहास कशासाठी नाही आल्या सगळ्या गोष्टी मँनेज
करता तर काय बिघडलं?
कसं आहे ना की, आपण
समजतोय की आपल्याला सगळं कळतंय... शिवाय `बाईच्या जातीला हे
आलंच, हे केलंच पाहिजे` अशा `पाहिजे`च्या नावाखाली अनेक
गोष्टी आपल्यावर लादल्या जातात... काही वेळा त्यांचा भडिमार केला जातो. आता हे
लादलेलं ओझं भिरकावून द्यायला हवं. याचा अर्थ असा बिल्कुल नाही की जबाबदारी
घ्यायचीच नाही. तर ती घ्यायची नि पारही पाडायची... पण आपलं मन राखून... स्वत्व
शाबूत ठेवून... सगळ्यांच्या सहकार्यानं.
कसं आहे ना की, आपण
हे जे ठरवतोय, त्याची चुणूक कुठंकुठं दिसायलाही लागल्येय... घरातली नि घरच्यासारखी
असणारी अनेकजणं मदतीचा हात हाती घेण्यासाठी उभी आहेत. अगदी मनापासून... मग ती
कोणतीही मदत असू शकेल. चिंटूचं स्वतःचा पसारा आवरणं असेल, मिनूचं रोपांना पाणी
घालणं असेल. नवऱ्याचं बाळाची नँपी बदलणं असेल, दोन्ही आई-बाबांचं सदैव मदतीसाठी
तत्पर असणं असेल. कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी मित्रानं केलेली मदत असेल, मैत्रिणीच्या
आईनं पाठवलेला खाऊचा डब्बा असेल. म्युझिक टिचरनं दिलेली शाबासकीची थाप असेल,
आवडत्या लेखकाचं आपल्या पत्राला आलेलं उत्तर असेल किंवा साधासा `मॉर्निंग` खरोखर `गुड` करणारा मेसेज
असेल... या सगळ्या सकारात्मक गोष्टी आपला हुरुप वाढवणाऱ्या ठरतात. `हे सगळं आपल्या भोवतालीच घडत असतं. `झिम्मा`त विजयाबाईंनी
म्हटल्याप्रमाणं, फक्त ते टिपकागदासारखं टिपून घेणं, आपल्याला साधायला हवं...`
कसं आहे ना की, सोनारानं
कान टोचले की कळतं, असं म्हणतात. पण कान टोचल्यावर कानातलं घालायचं की नाही, हे
ठरवणं आपल्याच हाती असतं. तसंच इथंही लागू पडतं. आपण काय करायचं नि काय नाही
करायचं हे ठरवून घ्यायचं. किती सोपी गोष्ट आहे. अशा कितीतरी गोष्टी आपण
निसर्गातूनही शिकतोच. रात्र संपल्यावर दिवस उजाडणार हे गृहितच धरलं जातं. आता काही
रात्री गडद, काळोख्या नि भयंकर असतात... त्या संपणारेत की नाही, अशी अनिश्चितताही जाणवते... पण न डगमगता त्यांना
सामोरं जायचं. प्रयत्न करत राहायचं... कुठूनतरी सूर्याची किरणं आपल्यापर्यंत
पोहचतील... या अटळ विश्वासानं...
कसं आहे ना की, हे
असले उपदेशाचे डोस आपल्याला अनेकांनी अनेकदा दिल्येत. फक्त ते आपल्या कानांवरून
गेल्येत... मनांत रुजलेले नाहीत. पण आता वेळ दवडणं चांगलं नाही. एकीकडं चांगल्याची
सुरुवात झाली असेल तर मग त्याची `लागण` सगळीकडं व्हायलाच हवी. पटतंय की हे ओझं उतरवणं
एवढं सोप्पं काम नाहीये... पण ते उतरवावं लागणारेय... अश्वत्थामासारखी भळभळती जखम
घेऊन फिरायचं की झाशीच्या राणीसारखं धाडस दाखवायचं... हे एकदा ठरायलाच हवं. बघा,
हे दाखलेही आता जुनेपानेच झाल्येत की. फारतर आता एखाद्या कल्पना चावलांचं नाव घेता
येईल. पण या मंडळींशी आपली तुलना होऊच शकत नाही, हेही आपल्याला मनातून माहिती
असतंच. मग `आपुलाचि वाद आपणासि` म्हणत आपणच आपला आदर्श (चांगल्या अर्थानं)
व्हायला काय हरकत आहे.
कसं आहे ना की,
प्रेम, ममता, माया, सौंदर्य, सेवा, सुशृषा, साहचर्य, सुगरण, सहकारी, वगैरे वगैरे
त्याच त्या पठडीतल्या भूमिकांत शिरताना आपण `स्व`लाच हरवून बसलोय. विसरलोय... विसरतोय... आपल्यालाही
एक चौथा कमरा हवाच आहे. आपलं अस्तित्व दाखवणारा... काहींनी तो मिळवलाय... काही
मिळवू पाहताहेत... फुकाच्या अहंकाराचे फुत्कार, कडवट भूतकाळ, अगतिकता, सोशिकपणा,
दांभिकता, सहानुभूती, अशा विविधरंगी भावभावनांच्या विटांनी आपल्या मनाची भिंत
लिंपून घेतोय आपण... हे सगळं बांधकाम आता अनधिकृत ठरवा. मनाचं अवकाश कसं लख्खं... मोकळंढाकळं
असू द्या... त्यात प्रसन्नता, उत्साहाचं शिंपण करा फार तर. सकारात्मकता मात्र
कायमची वस्तीला असू द्या. मग `मी` नि `तू`मधलं अंतर पार मिटूनच जाईल... तेव्हा `you & me`चा `we` होईल. हा `आपण सगळ्याजणी` एकत्र,
एकभावनेनं असण्याचा क्षण खरंच महत्त्वाचा... त्या क्षणाची आत्मीयतेनं वाट बघत बसण्यापेक्षा चला, थेट
कामालाच लागूया...
-
mast
ReplyDelete