Sunday, 17 September 2017

पुर्नभेट




आणि अखेरीस आपण भेटलो... आठवतयं का तुला? आठवतेय का तुला, ती दोन वर्षांपूर्वीची भेट... http://shbdaphulanchi.blogspot.in/2015/05/blog-post_17.html कितीकिती अडीअडथळे पार करुन भेटलो होतो आपण. ऐन उन्हाळ्यातील एक सकाळ होती ती. कोवळ्या सूर्याच्या किरणांसोबत सुरु झालेला `ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाईज`... छानच रंगल्या होत्या आपल्या गप्पा... आणि आता या वेळचा योग जुळून आला थेट पावसाळ्यातलाच... आदल्या दिवसभर चक्क उन पडल होतं आणि रात्री बऱ्यापैकी पाऊस कोसळू लागला. वाटलं कसं काय भेटणार आपण? यावेळी एका ग्रुपसोबत यायचं होत बसमधून तुमच्याकडं. पण नशीब पावसानं उघडीप दिली आणि आम्ही तुमच्या घरी- `ओवळेकरवाडी`त पोहचलोदेखील...
 
खरंतर वाडीत पोहचल्यावर भारी फिलिंग होतं एकदम... भोवताल ओळखीचा तरीही अनओळखी वाटत होता... तुमच्याकडं यायच्या वाटेवरच्या चिखलातून वाट काढत काढत शेडमध्ये पोहचलो. तोपर्यंत जणू पावसानं एक मोठ्ठा पॉज घेतला होता. मग तो पुन्हा कोसळायला लागला. मग फुलपाखरं, त्यांचं लाईफ, त्यांची लाडकी झाडं वगैरे माहिती मिळवली, खरंतर शास्त्रीय माहिती गेल्या वेळीही मिळालेली, खरी उत्सुकता होती तुम्हाला भेटण्याची... ते `फुलपाखरी क्षण` अनुभवण्याची... बाहेर पाऊस कमी होण्याची चिन्ह दिसू लागली. तितक्यात एक नवजात फुलपाखरू त्याच्या कोशातून बाहेर आलं आणि त्यानं पंख पसरले नि क्षणभर भिरभिरलं आणि चटकन शेडबाहेर उडून गेलं. आम्हीही ते निमित्त साधून बाहेर पडलो. तर ते बाहेरच्याच झाडावर निवांत मुक्काम ठोकून बसलेलं. मग काय, धडाधड फोटो नि व्हिडियो शुट सुरु झालं, जे निघेपर्यंत चालूच होतं...

ये टाईम मेरे पास बडा लेन्सवाला कॅमेरा था। बारिश फिर से रुकावट लिये हमें खेद है, ऐसाही बोल रही थी। गिर रहीं थी, रुक रहीं थी। फिर भी हम लोग थोडा घुमे। कुछ कुछ बटरफ्लाय देखे हमने। बच्चे लोग खरगोश के साथ खुश हो गये थे। बटरफ्लाय कहॉं रहते है, जैसे कई सवाल बच्चोंने किए और उनके जबाब मिल गये। फिरुन फिरुन थकल्यावर शेडमध्ये परतलो. पावसाचा थोडासा राग आला होताच. पण पुढ्यात आलेल्या टेस्टी मिसळ पावच्या चवीनं राग पळून गेला. या ट्रेल निमित्तानं बच्चे कंपनीशी चार तासांची दोस्ती झाली. त्याचा स्मार्टनेस, टेक्नोसॅव्हीनेस नि हजरजबाबीपणा हे गुण घेण्यासारखे होते. शेअरिंग-केअरिंगचे धडे तर आम्ही सगळ्यांनीच गिरवले. फुलपाखरं नि त्यांचे `फुलपाखरी क्षण` क्षणभर सोडवत नव्हते. पण परतणं भागच होतं. मग पुन्हा पुन्हा मागं वळून बसमध्ये बसलो. परतीच्या वाटेला लागलो. पाऊस सुरु झाला. पुन्हा... खराखुरा... आणि `फुलपाखरी क्षणां`च्या आठवणींचाही... आता पुर्नभेटीपर्यंत हा पाऊस कोसळत नव्हे, भिरभिरतच राहिल... कदाचित अगदीच एकटं वाटू नये, म्हणून मग फुलपाखरं आलटूनपालटून येतात हो तशी थेट घरच्या गॅलरीतल्या फुलांवर सेकंदभरांच्या हवाई भेटीला...  एकूणात भिरभिरणं चालूच राहातं... त्यांचं आणि आपल्या मनाचंही...



छायाचित्र- राधिका कुंटे

      

Sunday, 3 September 2017

आठवण



`ती` गेली... `ती` गेली आणि पाच वर्षांपूर्वीच्या जखमेवर धरलेली किंचितशी खपली पुन्हा निघाली... की ती खपली धरलीच नव्हती प्रत्यक्षात... मनाच्या कुठल्याशा कोपऱ्या जखम आहेच भळाळती... दुःख आहेच वेटोळं घालून बसलेलं... विरह आहेच आपल्या माणसांचा... आपल्या जिवलागांचा... आताआत्ताच गेलेल्यांचा... काही वर्षांपूर्वी गेलेल्यांचा... अकाली गेलेल्यांचा... अकस्मात गेलेल्यांचा... वय झालं म्हणून गेलेल्यांचा किंवा एकूणच गेलेल्या सगळ्या सगळ्यांचा... आठव आहेच त्यांच्या स्मृतींचा... पिंगा घातला जातो अनेकदा आठवणींचा... डोंगर उपसले जातात क्षणा न क्षणांचे... सुखाची माती आणि दुःखाचे दगड... आनंदाचे ओढे आणि भावनांची झाडं... बहरतात, फुलतात, कोमेजतात, मान टाकतात... पुन्हा नव्यानं नवी नाती जन्मतात...

आठवणी झऱ्यासारख्या पाझरतात... भावनांना फुटतात कोंब... काळाचा सुटतो ताल... सलग सलग सरती चित्रे... पुरतो एक क्षण... धावत सुटते मन... वाऱ्याहून वेगात... ते कवळते असंख्य स्मृतींना... एक एक धागा गुंफतो... आठवणींचा रेशीम गोफ... मध्येच येतं वास्तवाचं भान... अन मनाला शोक अपार... विसरू म्हणता विसरेना... हाती काही गवसेना... मग जिणं होऊन जातं अधांतरी... तरी सल राहतोच अंतरी... दुःखाची बांधली जातात गाठोडी... लोटून दिली जातात मनात कुठंतरी... वाटतं गेली पार ती खोल खोल तळात...वाटतं की, दिसेनाशी झाली असतील मनाच्या समुद्रात... मग असं काही घडतं... मनसमुद्राचा ढवळला जातो तळ... तयार होतो एक भोवरा... गरगर गरगर... पुरता वेटोळून घेतो तो आपल्याला... चालते बाहेर येण्याची धडपड... कुणी चटकन सावरतं... कुणाला लागतो वेळ... कुणी वरवर असतं ठीक... कुणाचा कधीच बसत नाही मेळ...

पुन्हा भोवरा... पुन्हा बाहेर पडणं... पडणं आणि उभं राहाणं... गेलेल्यांनी हेच तर केलं असावं... त्यांचा कित्ता गिरवावा हे खरं... पण... पण कित्ता गिरवताना आठवणींचं रान फोफावेल का पुन्हा... पडेल का भावनांच्या वेलींचा विळखा... येण्या-जाण्याच्या घड्याळातील लंबकाची भूमिका बजावणारं आपलं आयुष्य... समजून घ्यावं का, त्यातलं इंद्रधनुष्य... ते पाहा, दिसतंय त्या तिकडं... मनातल्या आठवणींच्या डोहाच्या काठाशी... आजवरचे संस्कार, दिलेली शिकवण, जपलेली नाती, जोडलेली माणसं, समजुतीचा ठेवा, विद्येचं महत्त्व आणि माणूसकीचा वसा या सात गोष्टींचा वारसा आपसूकच लाभलेला असतो... तो जपणं हीच त्यांची आठवण ठरावी...



   

(छायाचित्रं – इंटरनेटवरून साभार.)

Sunday, 20 August 2017



किमया... 

पावसाची... उन्हाची नि  `त्याची`ही... 
आणि त्यानंतर... 




Saturday, 5 August 2017

एक एक धागा गुंफी


परवा आमच्या एका चर्चेमध्ये बऱ्यापैकी वादावादी झाली. खरंतर `वादावादी` हा थोडा चांगलाच शब्द झाला. जवळपास शाब्दिक हमरीतुमरीच झाली. नाss... नाss... नाss... नाss... नेहमीचाच भांडणतंटा नाही, किंवा कुणाचा `इगो` वगैरे `हर्ट` नाही झाला. पण `ब्रेन स्टॉर्मिग` होतं हे नक्की. मुद्दा अगदी साधासाच होता. की समजा, आपल्याभोवती आपली आपणच काही काल्पनिक वर्तुळं आखायची म्हटली, तर त्यात कोणकोणत्या गोष्टी येतील, त्या लिहायच्या होत्या. मग डायरी-पेन, मोबाईल नोटपॅड, टॅब, रफपेपर असं सरसावलं गेलं. त्यावर क्रमवारीनुसार वर्तुळं लिहिली गेली. काय काय होत त्यात... तर स्वत:, घरचे, नातलग, मित्रमैत्रिणी, सभोवताल, आवडत्या गोष्टी, परिसर, शहर, राज्य, राष्ट्र, जग वगैरेवगैरे. तसं पाहिलं तर ही वर्तुळं तशी कॉमनच! काहींच्या वर्तुळांत मी-माझी, मी-मित्रमंडळी, मी-माझ्या आवडत्या गोष्टी अशा मुद्द्यांचा समावेश होता. यावर चर्चा होणं स्वाभाविकच होतं. पुढ्यात चहा नव्हता, ते सोडून द्या. तरी चर्चा रंगली. मुद्दे ठासून मांडले गेले. योग्य-अयोग्य, प्रत्येकाचा प्राधान्यक्रम, विचारप्रक्रिया आदींचा उहापोह झाला. तो विषय सर्वांसाठी तेवढ्यापुरता संपलादेखील असावा...

`पण`... या `पण`मध्ये कधीकधी किती गंमत असते नाही. हा `पण` बऱ्याच शक्यता निर्माण करतो. सकारात्मक, नकारात्मक तटस्थ वगैरे वगैरे. त्या `पण`मुळंच नेहमीप्रमाणं डोक्यात विचारांचे ढग जमा होऊ लागले... ते तसे होऊ लागले, तर काय होतं ते आपण `फिलिंग...` http://shbdaphulanchi.blogspot.in/2017/07/blog-post.html या `ब्लॉग`मध्ये पाहिलंच. तर ते जमा होत होते. तेव्हा मी चालत होते चर्चगेट स्टेशनच्या दिशेनं. मेट्रो३साठीच्या खोदकामी भुलभुलैयातून कशीबशी काढत होते. वाटेत असताना त्या ढगामुळं मनातच तयार झाला जणू एखादा स्क्रिन. फक्त स्वाईप करायचा...

तर त्या स्क्रिनवर झळकला एक उसनापासना चेहरा. अनेकांप्रमाणं मीही डिपी ठेवला होता एका उसन्या चेहऱ्याचा. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेच, पण पुन्हा केव्हातरी. तर ही होते मी. म्हणजे त्या स्क्रिनवरची `मी`. तर लेखातले संदर्भ त्या `मी`ला आणि या लिहिणाऱ्या `मी`ला लपेटून आलेले आणि खरेच असतील असं नाही. असल्यास तो योगायोग समजावा... मग स्वाईप करत राहिले. त्या ``और दिखाओ, और दिखाओ,`` असं जाहिरातीत म्हणणाऱ्या मुलासारखं स्वाईप केलं सरसरपणं. एक के बाद एक दृश्यं येत राहिली.
तर तितक्यात आलं चर्चगेट स्टेशन. काळ-काम-वेगाचं गणित सोडवण्याचा कसोशीनं प्रयत्न करणारी माणसं, मुंग्यांसारखी ये-जा करत होती. लोकल्सची ये-जा चालू होती. एकीत माझं चढणं. ती स्टेशनगणिक थांबणं. माझ्या स्टेशनवर उतरणं. पुन्हा मोठ्या जनसमुदायाचा भाग होणं. घरी परतताना मुंबईबाहेरच्या मैत्रिणीचा फोन येणं. तिच्यासोबतच्या गप्पा. इतर देशी-परदेशी स्थायिक झालेल्या मित्रमैत्रिणींची ख्यालीखुशाली वगैरेवगैरे. घरी पोहचून घरच्यांशी होणारा संवाद. थोडंफार कामकाज. मग सोशलमिडिया चेक करणं. मैत्रीदिनानिमित्तानं ओतप्रोत ओसंडून वाहणारा इनबॉक्स. फोटो वगैरेवगैरे. रक्षबंधनासाठी देश-विदेशातील भावांशी साधलेला स्काईप, इन्स्टाग्राम, व्हॉटस् अँप चॅट, फोन्सच्या माध्यमांतून साधलेला संवाद आणि घराजवळच्यांशी झालेली प्रत्यक्ष भेट. तिकडं ईमेल इनबॉक्समध्ये होते, `पीआर`नी पाठवलेले किंवा ऑनलाईन साईटसच्या मार्केटिंगचे ईमेल्स, अर्थातच स्वातंत्र्यदिनानिमित्तानं होणाऱ्या इव्हेंट किंवा ऑफर्सचे. ये लो भाए, हो गई क्या दुनिया मुठ्ठी में???...

तर लहान मुलांच्या चित्रांच्या पुस्तकात कसं असतं की, हे १ ते १०० अंक जोडा आणि तयार होणार चित्र रंगवा. तसाचा काहीसा आहे का, या `मी`पणाच्या केंद्रबिंदूचा प्रवास... हे आत्ता सांगितलेले बिंदू कनेक्ट केले तर या `मी`पणाचा केवढा थोरला विस्तार होतो आहे पाहा... किती किती मोठा पसारा आहे हा... इवल्याशा केंद्रबिंदूपासून सुरू होतहोत प्रसंगी जगाला कवेत घेऊ शकणारा... या पसाऱ्याचीच मग होते एक रेष! होतो मग एक धागा! ती रेष नि तो धागा असतो विचारांचा, मैत्रीचा, आदराचा, प्रेमाचा. तो होता आधुनिक साधनांच्या वापराचा, विस्ताराचा, संवादाचा... हे  जणू प्रतिबिंब होतं व्यक्तिगणिक वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या वर्तुळांचं. ही वर्तुळं एकमेकांना छेदणारी होती? की स्वतंत्र होती?... विचारांच्या धाग्यांचं एक टोक सकारात्मकता होतं नि दुसरं टोक होतं मानवता. आता त्या दोन टोकांच्या मधले विचार आणखीन धुंडाळायचे म्हटले तर `विचारांच्या ढगां`ना थोडा विराम घ्यावा लागेल. म्हणून तंद्रीतून सावध होत विचारांचे ढग बाजूला सारले. कल्पनांना दूर लोटून दिलं. `मनाचा स्क्रिन` काही केल्या ऑफ होत नव्हता, तर मग तो `रिस्टार्ट` केला. इतकं होईपर्यंत सकाळ उजाडलीच... पुन्हा कामाला लागणं आलंच ओघानं... ते करताना वाटेत काहीतरी लुडबुडू लागलं... मांजरीच्या पिल्लासारखं सारखं पायात घोटाळू लागलं... हा तोच तो धागा होता मगाचचा... ओssहोss... आता हे एकेक धागे पुन्हा गुंफायचे म्हणजेss... ढग पुन्हा जमा होणारss नि विचार बसरणारss... ब्रेन स्ट्रॉर्मिंगss, आगे बढो, हम तुम्हारे साथ हैंss...





छायाचित्र – इंटरनेटवरून साभार.

Sunday, 23 July 2017

पाणी... बाटली... पाणी...

त्या दिवशी कामानिमित्त पोहचायचं होतं एके ठिकाणी वेळेत. मग धावतपळत स्टेशन गाठलं. स्टेशनरोडवरच्या वाटेतला चिखल, खड्डे आणि प्लॅस्टिकचा भस्मासूर जागोजागी आपलं अस्तित्व दाखवून देत होता. ते सारं काही टिपिकल मध्यमवर्गीय नजरेआड करून चालत राहिले मुकाट स्टेशनची वाट. तिकिट काढलं. धडधडती गाडी येऊन थडकलीच होती. चटचटा ब्रिजच्या पायऱ्या उतरून, गनिमी कावा साधत, मुंबईकरांच्या अंगभूत चपळाईनं लक्ष्य गाठलं. गाडी सुटली... गाडी पकडता आल्याचा आनंद मनाजोगती जागा मिळाल्यावर व्दिगुणित झाला. हुश्शsss करून टेकले. समोरच्या बाकावर नजर गेली नि कडूजार गोळीनं तोंडभर पसरणारी चव क्षणभर आठवली... आता प्रवासभर हे सहन करावं लागणार होतं. इतरांप्रमाणं नशीबाला दोष देत जागा बदलायची संधी होती आणि तशी जागाही होती. पण... पण तिनं तर मला जवळपास खिळवून ठेवल्यासारखं झालं होतं... पुन्हापुन्हा माझी नजर तिच्याकडंच जात होती. मधल्या स्टेशन्सवर होणारा जुजबी चढ-उतार आमच्यात कोणताही अडथळा आणत नव्हता. बाकीच्या आमच्या बाकांच्या आगे-मागे, शेजारी बसत होत्या. हाच क्षण साधला गेला जणू नि आमच्यातल्या काल्पनिक संवादाला मोकळं रान मिळालं...

प्रश्न – कोण ग तू?
उत्तर – प्लॅस्टिकची बाटली
प्रश्न – कुठून आलीस?
उत्तर – माहिती नाही.

(स्वसंवाद – हे बाकी खरंए. ना तिच्यावर कोणतं लेबल होतं ना कोणत्या कंपनीचा चटकन दिसेलासा छाप.)

प्रश्न – कोणी तुला इथं ठेवलं?
उत्तर – माहिती नाही.
प्रश्न – तुझ्यात काय आहे?
उत्तर – पाणी... पाणी...
प्रश्न – पण अर्धीच बाटली पाणी...
उत्तर - माहिती नाही.

(स्वसंवाद – हे बाकी खरंए. बाटली रिकामी आहे की भरलेली हे पाहाणं, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे.)

त्यानंतर आदळू लागले प्रश्न नि तर्कटलेले विचार... कारण तिच्याकडं उत्तरं नव्हतीच.
प्रश्न – तुझी मालकीण कोण?
प्रश्न – पाणी अर्धवट का प्यायलं गेलंय?
प्रश्न – बाटली गाडीत का ठेवली?
प्रश्न – पाणी नको असलं, तरी बाटली घेऊन जायची. झाडांना घालायचं ना?...
प्रश्न – कदाचित पर्समध्ये जागा नसेल नि बाटलीची अडगळ वाटली असेल?...
प्रश्न – कदाचित घर जवळ असेल, आणखी पाणी नको असेल?...
प्रश्न – कदाचित ती आळशी असेल?...
प्रश्न – कादाचित तिच्याकडं पाणी भरपूर असेल?...

sssहो... या मुद्द्यावर गाडी अडकलीच... त्याभोवतीच्या शक्यतांचा वेढाच पडला जणू. की पाणी भरपूर असणारी ती कुठं राहात असावी?, पाणी विकत घेतलं असेल? की घरातलंच भरून घेतलं असेल?, विकत घेतलं असेल तर बाटलीवर लेबल कसं नाही?... कायदा तर म्हणतो... वगैरे वगैरे. त्या नंतर त्या बाटलीच्या भविष्याचा अंदाज घ्यायला मन कचरू लागलं. अशा माणशी बाटल्या विसरल्या गेल्या तर... या बाटल्यांची संख्या वाढली तर... या बाटल्यांचा डोंगरच होईल एक कादाचित... तो पार कसा करणार आणि त्यानंतर तरी पाणी हाती लागेल का... की सरळ ही बाटली उचलावी आणि स्टेशनवरल्या प्लॅस्टिक बाटली क्रशरमध्ये टाकावी...

``अगला स्टेशन...`` या गाडीतल्या घोषणेनं भानावर आले. माझं तिच्याकडं पाहात राहाणं डब्यातल्या काहीजणींच्या लक्षात आलं असावं. कसंनुसं हसून मी काहीच न झाल्याचं भासवलं. नकळत हात तिला उचलायला लांबवला नि क्षणार्धात तो मागंही आला. टिपिकल मध्यमवर्गीय दृष्टिकोनाचा अडसर उभा राहिलाच. माझ्या स्टेशनवर मी उतरून गेले... ती मात्र खोलवर विचारांत दडून बसली... काम संपवून दुसऱ्या गाडीनं घरी परतू लागले. आसपासच्या बाकांवर सहप्रवासिनी होत्या नि ती नव्हती. मनाशी हुsssश्श म्हणतानाच दिसलं पाणी... माझ्याच बाकावर होतं... पावसाची झड आली असावी खिडकीतून... ठीकए ना... आपण काय करणार? असं मनात पुटपुटतानाच जाणवलं, तिचं अस्तित्व!!! माझ्याच पर्समध्ये, समोरचीच्या बॅगमध्ये, पलीकडच्याच्या सॅकमध्ये, डबाभर, गाडीभर, स्टेशनभर... तिचं अस्तित्व विस्तारतच गेलं झपाट्यानं... क्षणभरात पुन्हा भास झाला... प्लॅस्टिकच्या बाटलीचा झाला डोंगर... पाणी आपल्यापासून दुरावतंय फर्लांगभर... वो किस की हैं? मेरी, आपकी, उसकी?...

``अगला स्टेशन...`` या गाडीतल्या घोषणेनं भानावर आले. माझं तिच्याकडं पाहात राहाणं, डब्यातल्या काहीजणींच्या लक्षात आलं असावं. कसंनुसं हसून मी काहीच न झाल्याचं भासवलं. नकळत हात ते पाणी पुसायला लांबवला नि क्षणार्धात तो मागंही आला. टिपिकल मध्यमवर्गीय दृष्टिकोनाचा अडसर उभा राहिलाच. माझ्या स्टेशनवर मी उतरून गेले... आता घराकडं परतायची लगबग... ती मात्र खोलवर विचारांत दडून बसलेली आहे... पावसाच्या पाण्याचे सपकारे बसू लागले चेहऱ्यावर... तरी छत्री न उघडता तशीच चालत राहिले... विचारांच्या सरींवर सरी पडतच होत्या... गाडी, बाटली, पाणी... अन् बाटली, पाणी... अन् पाणी... पाणी...




(छायाचित्र – राधिका कुंटे.)

Sunday, 9 July 2017

`फिलिंग थॉटफुल`...


`फिलिंग थॉटफुल` लिहून काढले जातात ढग
त्या ढगांपलिकडं असतं का हो जग?
त्या ढगांच्या किनारींना वास्तवाचे रंग
त्या ढगांच्या रेखाटनांना वास्तवाचा संग
त्या ढगांतून कोसळतो विचारांचा पाऊस
थेंबाथेंबांतून भरतो जाणिवांचा ऊरुस
जाणिवांच्या बीजांना संवेदनांचं आवरण
लगेच घेतात मनाच्या जमिनीवर लोळण
मनाच्या जमिनीची हवी मशागत करायला
शिकावं लागेल तिला विचारधारी व्हायला
विचारांची बीजं पडली की हो मनांत...
काहीकाही तरी रुजली काही जनांत...
मनातल्या रोपांचं रुप वेगवेगळं
कशी काय वाढतील विचारांची बाळं?
कधी तरारून, कधी झरझर
कधी संथ लयीत कधी भरभर
कधी कच्चा, कधी पक्का
विचारांचा बुंधा वाढवतो सत्ता
कधी भावनांच्या वेली जातात आवळल्या
कधी खुडल्या जातात कळ्या कोवळ्या
कधी विषाची फळे गोमटी
कधी व्देषाची फुले कपटी
वाढतं मग कोलाहलचे रान
सुटते तेव्हा विचारांचे भान
संवेदनांचा पडतो दुष्काळ
जाणिवांचा खोल डोह अपार
मनाच्या तळघरात बांधलेली भूतं
पळतात सैरावैरा होऊ `सोशल पोस्ट`
क्लिकले जातात फोटो
रेकॉर्डले जातात व्हिडिओ
व्हायरलची येते साथ
नेणिवेतले विचार भुईसपाट
पुन्हा एकदा वाटतं `फिलिंग थॉटफुल`
काढला जातो ढग ब्युटीफुल
जाणायचं असतं जग पलिकडलं
जगावसं वाटतं किनाऱ्यावरचं
ढगांपेक्षा वाटू लागतो समुद्र आपलासा
विचारांच्या लाटांचा वाटतो भरवसा
संवेदनांचा जमतो कोरडा पापुद्रा
आली आली आली लाट...
लवकर पळ काढ समुद्रा
समुद्र पळून चालेल कैसा?
आपल्याचभोवती आवळला फासा
विचारांच्या पाण्याची होते वाफ
ढगाढगा कर मला माफ!!!
मनाची मशागत नाही झाली पुरी
विचारांची रोपं अजूनही साधीभोळी
तर्कांचं खत आणि नेणिवांची माती
सत्याचं सिंचन आणि मोकळा वारा साथी
स्वप्नकल्पनांचं तण काढायला हवं दूर
परिस्थितीचा पडताळता यायला हवा नूर
विचारांच्या क्षितिजाचा विस्तारे परीघ
ढग आणि समुद्र आता आले समीप
विचारांचा पाऊस लागलाय पडू...
फिलिंग आता काय काय लिहू?...


(छायाचित्रं – इंटरनेटवरून साभार.)


माझ्या ब्लॉगची नव्वदावी (९०) पोस्ट.



Sunday, 25 June 2017

पाऊस पाऊस पाऊस पाऊस


पावसाआधी होता पाऊस... पावसानंतर होता पाऊस...
पावसासंगे होता पाऊस... पावसाविरुद्ध होता पाऊस...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

पावसाचा मित्र पाऊस... पावसाचा शत्रू पाऊस...
पावसाचा गोतावळा पाऊस... पावसाचा परका पाऊस...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

पाऊस सरसर... पाऊस झरझर...
पाऊस गडगडाट... पाऊस कडकडाट...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

पावसाळी विजा चमकणं... पावसाळी कल्पना सुचणं...
पाऊस हिरवागार... पाऊस पाणीदार...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

पाऊस टपटपणारा... पाऊस कोसळणारा...
पाऊस ओलागच्च... पाऊस सच्चा मित्र...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पाऊस वळणदार... एक पाऊस समुद्रापार...
एक पाऊस लहरी... एक पाऊस भिरभिरी...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पावसाळी नाव... एक आठवणींचा गाव...
एक फुल उमलणारं... एक नातं फुलणारं...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पाऊस कटिंग चाय... एक पाऊस विचारांची साय...
एक पाऊस तरणा, एक पाऊस म्हातारा...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पाऊस पावसाळी... एक पाऊस अकाली...
एक पाऊस अंकुरता कोंब... एक पाऊस पिकलं झाड
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एका पावसाचं महाभारत... एका थेंबाची कविता...
एका सरीचं गाणं... एका सरव्याचा पोवाडा...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पाऊस पाऊस... दोन पाऊस पाऊस
एक पाऊस पाऊस... पाऊस दाहे पाऊस...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस... 



(छायाचित्रं – इंटरनेटवरून साभार.)