Sunday, 25 October 2015


sssवाssssss




जाणीव–नेणिवेच्या प्रदेशातल्या सीमारेषांपाशी घुटमळताना भोवती कितीतरी आवाजांचा हाsss भलाथोरला पसारा असतो. हे `आवाज` त्या त्या प्रदेशांतले, त्या त्या भाषांतले, समूहांमधले नि व्यक्तींनुसार बदलत जातात...

एकेकाळी घराघरांतील सकाळ `आकाशवाणी`च्या`मंगलप्रभातsss`नं उजाडायची. `आकाशवाणी`च्या आवाजी दुनियेनं अनेकांना ज्ञानसमृध्द केलं होतं नि आजही करतेय... मात्र आताशा श्रोत्यांची संख्या रोडावलेय. आकाशवाणीला पर्याय उभा राहिलाय एफएमचा. त्यांची जागा घेतलेय २४ तास कार्यक्रमांचा रतीब घालणाऱ्या वाहिन्यांनी... त्यात केवळ आवाज नाही दृश्यही आहेत. सकाळच्या ऐन घाईत असताना पाहायला वेळ असतो कुणाला... मग येता–जाता ऐकायचा बातम्या किंवा अध्यात्मिक कार्यक्रमांचा `आवाज`... आतातर हे आवाजही मागं सरकताहेत नि वरचढ ठरतोय हातातला स्मार्टफोन, ढीगभर अँप्सच्या `आवाजी नोटिफिकेशन्स`सह...

सकाळच्या वेळी प्रसंगानुरुप घराघरांत वृत्तपत्र वाचण्यावरून होणारी भांडणं, चहा पिताना वा बिस्किटं खाताना होणारे `आवाज` आताशा शिष्टसंमत मानले जात नाहीत. बाळाला न्हाऊ घालतांना `गंगेsssगोदे`चा स्वर केव्हाच लुप्त झालाय. आताशा असतो फक्त शॉवरच्या पाण्याचा `झुळझुळीत` झरा... मगचं पटापटा-खसाखसा पुसणं अणि वाऱ्याच्या वेगानं सारं आवरुन घराबाहेर पडायची घाई. त्यातच दुधवाला, केरवाला, इस्त्रीवाला आदींच्या सतत वाजणाऱ्या बेलांच्या `आवाजा`ची भर... मध्येच वाजणारी कुकरची शिट्टी नि मोबाईलचे विचित्र आवाजाचे रिमांईडर्स... या गदारोळात पहाटपाखरांचा किलबिलाट, वाऱ्याची हलकिशी झुळुक... उजाडतानाचा `सायलंट आवाज` ऐकायला कुणाला सवड नाहीये. आवरुन घराबाहेर पडल्यावर स्कूटीला किक मारताना, वॉचमनला हाकाट्या करताना, ट्रॅफिकच्या भुलभुलैय्यातून वाट काढत हॉर्न वाजवला जातोच. किंवा मग धडाडणाऱ्या लोकल्स नि खंडीभर स्टॉप घेत भोंगे वाजवत धावणारी बस या आवाजांशी आपली लय अनेकजण जुळवू पाहतात.  ऑफिसच्या रस्त्यावर धडाधडा उभे रहाणारे, शहरातल्या चाळींना मुडपून टाकून शाहजोगपणं उभे राहणारे टॉवर्स नि त्यांच्या बांधकामांचे ठोकsssठाकsss...घर्ट्टरsssखर्ट्टरsss आदी चमत्कारिक आवाज येत असतात. आपण ते आवाज कानाबाहेर टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करतो.

ऑफिसला पोहचता पोहचता कानाला जाणवणतं रस्त्याच्या कडेच्या भटाकडचं चहाचं उकळतं आधण, हायsssहॅलोsssचे आवाजी फवारे नि पुढ्यातल्या पीसीची वेलकम नोट  पाहात चढत्या भाजणीनं कामाला सुरवात होते. पंख्यांच्या घरघराटाची जागा ऑफिसबाहेच्या गुरगुरणाऱ्या एसीनं केव्हाच बळकावलेय... अजूनही येतोय डब्बेवाल्यांच्या सायकलची नेमानं वाजणारी घंटी नि आपल्या डेस्कवर डब्बा ठेवण्याचा आवाज... मध्येच कामवाल्या बाईचे, मुलांचे, निरोपानिरोपीचे, मित्रमैत्रिणींचे फोन्स सुरुच असतात. आजची मुलं तर कितीतरी आवाज ऐकायला मुकली आहेत.  कडकलक्ष्मी, वासुदेव, गोंधळी, नंदीबैल नि इतर लोककलांचे आवाज मुलांना फक्त वाहिन्यांवरच्या मनोरंजनाच्या माध्यामातून कळतात. एके काळी गायवाली `येsss ये बेबी येsss... गायवाली येsss` म्हणत रस्तोरस्ती फिरणारी गायवाली आता एका जागी निवांत बसून असते. कल्हईवाला, झाडूवाला, खटर्रsssटर्रsss आवाज करणारा कापूसवाला, भांडीssssss... आवाज देणारी भांडीवाली अशी `आवाजी मंडळी` जणू अदृश्य झालेत. `सुरमई, पापलेट कोळंबीsss` असे विशिष्ट वारी वाटे घेऊन येणारी रस्त्यानं जाणारी कोळीण ऐकू येते. `म्हतारीचाsss कापूसsss`, `चनाचोरsss गरमsss` नि `चिंचाssssssवळेsssबोsssरंsss` या हाळा दुर्मिळ झाल्यात. आताशा या चटकमटक आवाज करत खाल्ल्या जाणाऱ्या खाऊला तितकासा `स्टेटस्` उरलेला नाही, की अद्याप त्यांचा कोणाताही `ब्रँण्ड` डेव्हलप झालेला नाही. नाही म्हणायला अजूनही खाऊगल्ल्या नि गल्लीच्या कोपऱ्यावरचे `चुssssssसुsss` आवाज करत तयार होणारे वडे-सामोसे, `सस्सsss` करत मिटक्या मारत खाल्ल्या जाणाऱ्या चाटची चलती आहे. त्या आवाजांच्या साथीनंच जणू संध्याकाळ उगवते... घरी परतताना पुन्हा तेच ते सारे `आवाजी चक्र`. घरी जाण्याच्या सगळ्यांच्या घाईमुळं ट्रॅफिकचा कायमचा वाजलेला बोऱ्या नि कर्णकटू हॉर्न्सचं बॅकग्राऊंड म्युझिक... त्यात घराघरांतल्या डेली सोप्सच्या आवजांची भर... ध्वनी प्रदूषणाबद्दल कितीही लिहिलं-बोललं गेलं तरी सर्व धार्मिक सणवार-उत्सव-परंपरा-मिरवणुका यांच्या `आवाजी अस्तित्वा`ची जाणीव कानोकानी होत असतेच...

या `रुटिन आवाजां`ची दुनिया कधीतरी अचानक क्षणभर थबकते... निमित्तमात्र ठरतात ते २६जुलै/  रेल्वे बॉम्बस्फोट/ दहशतवादी हल्ले... तेव्हा जाणीव-नेणिवेचा मोठा कल्लोळच माजतो... पण हे घडतं केवळ काही क्षणांसाठी... पुन्हा एकदा `चलेsssचलोsss` म्हणत मुंबईकरांचं `लाईफ रिस्टार्ट` होतं. मग त्या `धावत्या लाईफ`ला `मुंबई स्पिरिट` असं गोंडस नाव दिलं जातं... खरंच `लाईफ स्पिरिट` असतं की `जगण्यातली अपरिहार्यता`... अंधाराला झाकोळणाऱ्या निऑन साईन्सच्या चकचकाटात रात्र कधीच निवून जाते. पाखरांच्या किलबिलाटात नवे किरण खिडकीपाशी येतात... त्याला असतो `आशेचा नि स्वप्नांचा आवाज`... तो `आवाज` सातत्यानं टिकवू पाहणारा असतो प्रत्येकाचा `आतला आवाज`... इथंच सुरू होतो पुन्हा जाणीव-नेणिवेचा प्रदेश... फक्त ओळखायला शिकला पाहिजे... `आवाज`...



 सुलेखन - जयंत कुंटे


             

Sunday, 18 October 2015


प्रिय भक्तांनो,

नमस्कार! कसं काय चाललंय? मुद्दामच `ई माध्यम` वापरलं नाही, तुमच्याशी संवाद साधायला. कारण `नेहमीपेक्षा वेगळं` कुणी काही केल्यावर त्याकडं तुमचं लक्ष वेधलं जातं, हे कधीचंच लक्षात आलंय माझ्या. आणि हो, अनेक घरांत घट बसवले गेलेत. त्यामुळं तुमच्याशी संवाद साधण्याचं काम अधिक सोपं झालंय. सध्याची परिस्थिती पाहाता, हा संवाद साधणं, हे आवश्यकच वाटतंय, मला...

कसंए की, नेहमी भक्त देवाला-देवीला साकडं घालतात, प्रश्न विचारतात. आतापुरती ही पद्धत आपण थोडी बदलूया. म्हणजे मी तुम्हांला काही प्रश्न विचारते. आणि हो हल्ली तुमची धुसर होऊ पाहणारी विचारक्षमता आणि `वेळ नाही` ही सबब ध्यानी ठेवून या प्रश्नांना पर्यायही देतेय. तुमच्या मते, नवरात्र म्हणजे काय? माझी अर्थात देवीची आराधना नि पूजा करणं/ मनसोक्त गरबा-दांडिया खेळणं/ स्त्रीशक्तीचा जागर करणं की हे नऊ दिवस फक्त सेलिब्रेशन टाईम मानून ते जस्ट एन्जॉय करणं. बघा काय उत्तर द्यायचं ते...

कसंए की, एकीकडं देवीचं स्वरुप म्हणून स्त्रियांना मान द्यायचा नि दुसरीकडं स्त्रियांवर अन्याय-अत्याचार करायचे... ही कोणती मानसिकता म्हणायची? देवी म्हणून पूजताना मग त्या धार्मिक कार्याच्यानिमित्तानं केले जाणारे उपासतापास, नेम आणि पारंपरिक गोष्टींची आज घडीला खरंच आवश्यकता उरलेय का? कितीजण-कितीजणी ते अगदी मनःपूर्वक करतात नि कितीजण ते केवळ परंपरा पाळायची म्हणून करतात? दुसरीकडं स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार तुमच्या चोहोबाजूला दिसतोय, मिडियातून त्याविषयी सतत मांडलं जातंय... पण त्याविषयी `काही वाटून घेतलं` जातंय? की आपल्या नाकासमोर चालण्याचा हेका तुम्ही सोडणारात? की किमान पक्षी त्यासंदर्भात दोन्ही बाजू जाणून घेऊन आपलं मत मांडायचा पर्यायानं विचार करायचा वसा तुम्हांला धरता येई का? आता तुमची मानसिकता बदण्यासाठी कोणते पर्याय निवडता याचा विचार करूया. त्यासाठी स्त्री-पुरुष समानता यायला हवी/ स्त्री सक्षमीकरण व्हायला हवं/ पुरुषांची मानसिकता लहानपणापासून बदलायला हवी की सामाजिक चालीरितींमध्ये काळानुरुप बदल व्हायला हवेत? बघा काय उत्तर द्यायचं ते...

कसंए की, की `बदल करायचे` म्हटलं की त्याचा `श्रीगणेशा गिरवणं` गरजेचं ठरतंच. मग या बदलांची सुरूवात कुठून करावी? स्वतःपासून/ घरापासून/ भवताल की समाजापासून... तुम्हांला असे बदल होताना जाणवताहेत का? असतीलच तर ते कुठंकुठं होताहेत?... सोशल मिडियात लाईक-कमेंट-फॉरवर्ड करण्यापुरते/ समाजात वावरताना/ कॉलेज-ऑफिसेसमध्ये? की कुठंही हे बदल अद्याप झालेलेच नाहीत, जे व्हायला कधीच सुरूवात व्हायला हवी होती?... `नवरात्रा`चा खरा अर्थ प्रत्यक्षात केव्हा येईल?... स्त्रियांचं सबलीकरण झाल्यावर/ स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात आल्यावर/ तुम्ही सारेजण `माणूस` म्हणून वागू लागल्यावर/ की तुम्हांला एखादा पर्याय सुचतोय एवढा सगळा विचार केल्यावर?... अजून वेळ आहे, माझ्या विसर्जनाला. त्याआधीच जमलं तर बघा काय उत्तर द्यायचं ते...

तुमचीच,
देवी.



Sunday, 11 October 2015

पट्टीचा प्रसाद

एक होती मनी. गोबऱ्या गोबऱ्या गालांची. कुरळ्या केसांची नि टपोऱ्या डोळ्यांची. पण `मनी` हे तिचं खरं नाव नाही बुवा. तिचं खरं नाव होतं मनकर्णिका! आता एवढ्या अवघड नावानं कोण हाका मारणार ? मग `मनी` हेच नाव सगळ्यांच्या तोंडी बसलं.

आपली मनी होती पहिलीत, तेव्हाची ही गोष्ट! मनीच्या शाळेचा पहिलाच दिवस होता. सगळी तयारी झाल्यावर मनी मोठ्यानं बाsssय असं ओरडत आजोबांचा हात धरुन शाळेत गेली. शाळेचा पहिला दिवस मस्तच गेला. मुलांनी एजॉय केला. त्यातच समरचा वाढदिवस होता. त्यानं सगळ्यांना पट्ट्या वाटल्या, त्याही लाकडी!  आता आजच्या जमान्यात लाकडी पट्टी पाहिली कुणी होती? सगळ्यांकडं प्लास्टिकच्याच पट्टा होत्या ना!  मग काय? समरची कॉलर एकदम टाईट झाली. वर्गातल्या सगळ्यांनी ही पट्टी हातात घेऊनच घरी जायचं ठरवलं.

मनीला शाळेतून आणायला आजी आली होती. तिला त्या पट्टीचा प्रसाद द्यायची हुक्की मनीला आली. हलक्या हातानं तिनं आजीला पट्टी मारली. तिला वाटलं, आजी रागावणार नाही... आजीनं  फक्त मनीकडं आणि पट्टीकडं पाहिलं न पाहिलंसं केलंनं नि ती घराच्या दिशेनं चालू लागली. मग काय? घरी येताना वाटेतल्या झाडाझुडपांना, बसस्टॉपला, दुकानांच्या दारांना, गेटला अणि हो, घरच्या दरवाजालाही `पट्टीचा प्रसाद` मिळाला. कुणाला कमी, कुणाला जास्त, इतकंच.

घरात शिरतांनाच मनी पट्टी नाचवत ओरडली, हेsss मला पट्टी मिळालीsss येsss मनीच्या ओरडण्यानं पुस्तक वाचतांना डोळा लागलेले आजोबा दचकून जागे झाले. टॉमी भूsss भूsss करत एकदम घाबराघुबरा झाला. पण तिला काहीच फरक पडला नाही. हातपाय धुऊन दूध पिऊन झाल्यावर ती नेहमीसारखी अभ्यासाला बसली खरी, पण सारं लक्ष त्या पट्टीकडं होतं. मग बेरजेच्या वजाबाक्या झाल्या नि गुणाकारांचे भागाकार. सगळी स्पेलिंग चुकायला लागली. मनी अभ्यास तसाच ठेऊन उठली. पट्टी हातात घेतल्यावर तिला बरं वाटलं. मग टेबल, सोफा, खुर्ची बेड... कुण्णी म्हणून तिच्या तावडीतून सुटलं नाही.


एवढं होईपर्यंत आई–बाबा ऑफिसमधून आले. त्यांना पट्टी दाखवून झाली. जुन्या शिलाई मशीनवर आई शिलाई करायला लागली. पायी चालवाच्या त्या मशीनचा पेड्ल आणि चाक यांचा आवाज नि गती मनीला खूणावू लागली. आई दुसऱ्या कामाला उठल्यावर झटकन मनी पेड्लवर बसली नि मशीन फिरवू लागली. ठ्याकsss ठ्याकsss आवाज येऊ लागला. चाक फिरू लागलं. मग हातातली पट्टी त्यात जाऊ लागली. आतsss बाहेरsss.... आतsss बाहेरsss.... सगळ्यांनी समजावूनही मनी कुणाचंही ऐकत नव्हती. एका नव्याच खेळाचा तिला शोध लागला होता. मग झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या आधी, शाळेतून आल्यावर सारखा हाच खेळ. पट्टीचा आवाज आणि मज्याच मज्याच... घरच्यांचा धाक, ओरडा, प्रेमळपणा... कसलाच परिणाम मनीवर झाला नाही. एक दिवस अशीच खेळत बसली होती, खेळता खेळता कड्sssफटाक्sss असा आवाज झाला नि पट्टी तुकडेतुकडे झाले. बापड्या पट्टीनं तरी किती सहन करायचं ना?... पट्टीचे तुकडे पाहून मनीला रडू फुटलं. तिची लाडकी पट्टी तुटली होती. आता ती कुणाशी खेळणार होती? तिनं ते तुकडे जपून ठेवले, अज्जिबात मस्ती करायची नाही, असं मनाशी ठरवून. शहाण्या मुलीसारखा अभ्यास करून मनू खूप खूप हुशार झाली. एकदम फेमस पर्सनॅलिटीच... त्या पट्टीचे तुकडे अजूनही तिच्या घरात फ्रेम करुन ठेवलेत... `पट्टीचा प्रसाद` म्हणून... 

          

Sunday, 4 October 2015



रिपरिप रिपरिप

रिपरिप रिपरिप
संततधार संततधार
कोसळतोय तो मुसळधार
आहे जीवनाचा आधार
कधी करतो पुरतं बेजार
रिपरिप रिपरिप
संततधार संततधार
कधी भासतात थेंब कट्यार
एखादाच नेमका वार
तरीही वाटे ओढ अनिवार
रिपरिप रिपरिप
संततधार संततधार
त्या झोपडीतलं पोर
करतंय किरकिर
तरी तो बरसतोय बेसुमार
रिपरिप रिपरिप
संततधार संततधार
इथं फिर, तिथं फिर
डोळ्यांत साठव हिरवागार
सलाम ठोक परवरदिगार
रिपरिप रिपरिप
संततधार संततधार
प्रश्नार्थक जर-तर
उत्तराच्या सीमेवर
बरसत रहा धुवॉंधार
रिपरिप रिपरिप
संततधार संततधार